बुधवार, २० मे, २०२०

मैत्री


काय बोलावं या विषयावर... खरंतर बोलावं, लिहावं तेवढं कमीच. अत्यंत जवळचा आणि जिव्हाळ्याचा विषय आणि तोही प्रत्येकासाठीच. आयुष्यात असा कमीतकमी एक तरी जवळचा मित्र किंवा मैत्रीण नक्कीच असते. खरंतर मैत्री म्हणलं की खूप सारे मित्र मैत्रिणी नक्कीच असतात . परंतु एखाद्या अडचणीच्या ,सुख दुःखाच्या क्षणी सगळ्यांमधून अगदी मोजकीच नावं पुढे येतात, आणि हो खरंतर त्यांना सांगायची काहीच  गरज नसते कारण त्यांना सांगताच जवळजवळ सगळंच माहीत असते.
  मैत्री, म्हणजे मला तरी या शब्दाची कोणती अशी खास व्याख्या असेल असं वाटत नाही. कारण मैत्रीत कोणत्याच मर्यादा नक्कीच नसतात. पाहिजेल तेव्हा, पाहीजेल त्या विषयावर कश्याचीही पर्वा करता आपल्या सोबत आपला  सोबती बनून नक्कीच आपल्या बरोबर उभा असतो.
  मैत्री अगदी फार फार पूर्वी पासून अस्तित्वात असलेली गोष्ट आहे. उदा. श्रीकृष्ण आणि सुदामा, संभाजी राजे आणि कविकलश, तेनालीरामा आणि कृष्णदेवराय, अकबर आणि बिरबल, दुर्योधन आणि कर्ण.. अशी खूप सारी उदाहरणे पहायला मिळतात. या सर्व उदाहरणांमधून एक मात्र नक्की कळते की कुठल्याच मैत्रीत गरीब श्रीमंत, मान सन्मान , जात पंथ , राजा आणि प्रजा अशा कुठल्याच गोष्टी दिसत नाहीत किंबहूना दिसणारही नाहीच. कारण देव आपल्याला बहीण/ भाऊ देतो आणि तेही कसेही असले तरी मान्य करावे लागतेच परंतु मैत्री हे असे एकमेव नाते आहे की जे ठरवून, किंवा कोणत्याही मर्यादा ठेवून केले जात नाही मैत्रीचे नाते म्हणजे एक अनमोल आणि अतूट बंधन असते. 
  खरेतर रक्ताच्या नात्याहूनही कधी कधी खूप जवळचे मित्र / मैत्रिणी खूप आधार देणारे असतात. सगळ्यात महत्वाचे मैत्रीत स्त्री पुरूष असा भेदभाव तर कधीच नसतो. मैत्रीचे नाते म्हणजे अडचणीच्या काळात आधार देणारे तर कधी आनंदात सहभागी असणारे तर कधी कट्टयावर बसून गप्पा मारणारे... 
  आजकालच्या या social media च्या युगात मैत्री म्हणजे Friend request पाठवण्यापुरतेच मर्यादीत राहिले आहे. Facebook, instagram यावर अनेक मित्र / मैत्रिणी असतात परंतु वेळेला धावून येतात मदतीला येतात ते क्वचितच असतात खरंतर तेच खरे मित्र असतात. भलेही  इतर वेळी ते नसतील सोबत  परंतु हक्काने ,आपुलकीने वेळेला साथ द्यायलाच नसतील तर ते मित्रच कसले...?
   काही गोष्टी तर कधी कधी घरी देखील सांगता येत नाहीत , भावा बहिणीशी देखील बोलता येत नाही परंतु अशी एकही गोष्ट नसते की जी आपण आपल्या मित्राशी बोलत नाही. दिवसभरात घडणाऱ्या साऱ्या गोष्टी संध्याकाळी एका चहाच्या टपरीवर मित्रासोबत बसून बोलण्यात जी शांतता मिळते ती दुसरीकडे कुठेच मिळत नाही. कधी कधी तर बोलायला एवढे काही असते की एकाभेटीत काही संपत नाही. 
   मैत्री कधी कोणाशी कुठे कशी होईल सांगता येत नाही परंतु ती एकदा घट्ट झाली की आयुष्यभर साथ देते अगदी कोणत्याही बिकट परिस्थितीतही. कारण त्या मैत्रीत आपुलकी, प्रेम, जिव्हाळा, अगदी सर्व काही असते. चूक असल्यावर हक्काने बोलणारे, तसेच यश मिळाल्यावर कौतुक करणारे असे मित्र मिळायला तर भाग्यच लागते. आणि आयुष्यात प्रत्येकाचा असा एक तरी मित्र/मैत्रीण  असतेच.
   आयुष्यात मैत्रीची सुरुवात होते ती बहुतेक शाळेपासूनच. शाळेत बनलेले काही मित्र अगदी शेवट पर्यंत आपल्या सोबत असतात. नंतर जसजसे वय वाढते तसतसा मित्रपरिवरही मोठा होत जातो परंतु आपल्या जवळचा, अगदी नेहमी सोबत असणारा एक तरी 'परममित्र' नक्कीच असतो.
   मित्रकुणी त्याला दोस्त म्हणतं, कुणी यार म्हणतं, तर कुणी भिडूअसं म्हणत खांद्यावर हात ठेवतो. आपल्या आनंदात सहभागी होणारा आणि दु:खातही आपल्या पाठीशी खंबीरपणे उभा असतो तो मित्रच.
   बाकी मैत्रीचे किस्से सांगावे तेवढे कमीच. शाळेतील मजा मस्ती, मैदानातली खेळाची भांडणे , महाविद्यालयीन जीवन ते आयुष्यच्या प्रवासात परिवरसोबतच अमुल्य गरज असते ती मैत्रीची. कारण कधी कधी रक्ताच्या नात्याहूनही जवळचे असे एकच नाते असते ते मैत्रीचे...
   

गुरुवार, १४ मे, २०२०

मन...

'मन' शब्दच किती जवळचा वाटतो. खरंतर तर मन नावाचा ना कुठला अवयव आहे ना कुठले इंद्रिय आहे आपल्या शरीरात. तरी अगदी रोजच्या जीवनात किती सहजतेने वापरतो हा शब्द आपण.
  
खरंतर मन बघायची गोष्ट नसून ते अनुभवण्याची, जाणून घ्यायची गोष्ट आहे. आपल्या डोक्यात तर हजारो विचार येत असतात ते येतात कधी जातात हे तर कळत सुद्धा नाही कधी कधी. पण मनात जे विचार येतात ते आपल्याला स्वतःहून  वाटणारे, काहीतरी आकर्षण असणारे, कश्याबद्दल तरी उत्सुकता, कुतूहल निर्माण करणारे विचार हे नक्कीच मनातून येतात ते राहतात ही.
   
मन हे अगदी पाण्याच्या प्रवाहासारखे असते मनात येणारे विचार जर अडवले तर ते पुन्हा कुठल्या कुठल्या मार्गाने नक्कीच पुन्हा येणार. जसे पाणी त्याचा मार्ग शोधत आपला प्रवास सुरू ठेवते तसेच विचार ही कधीच थांबत नाहीत, अन जर मनात येणाऱ्या विचारांना थांबवण्याचा प्रयत्न केला तर त्यांचा उद्रेक होऊन त्रास मात्र नक्की होणारच. कितीही ठरवले तरी एकवेळ डोक्यातून काही विचार जातील पण मनातले विचार मात्र कधीच दुर्लक्षित करता येत नाहीत.
   
काहींचे मन तर खूपच हळवे असते तर काहींचे खूप कठोर. अर्थात त्यामागेही काहीतरी कारणे नक्कीच असतात. पण एक मात्र नक्की असते कुठलाही व्यक्ती कुठलीही कृती त्याला मनापासून पटल्याशिवाय कधीच करत नाही.
   
अनेक विचार येतात, खरंतर खूपच येतात.. काही खरच खूप चांगले असतात तर काही निव्वळ निरुपयोगी जे मनाला पोखरून टाकणारे असतात आणि कधी कधी  तर  चांगले विचार येऊन देखील कळत नाही. कारण मन ते समजून घ्यायला तयारच नसते हा झाला प्रत्येकाच्या अनुभवाचा प्रश्न. मनात येणारा प्रत्येक विचार हा काहीतरी कारण असल्याशिवाय नक्कीच येत नाही. फक्त तो आपण कसा समजून घेतो कोणत्या दृष्टिकोनातून बघतो यावर सगळं अवलंबून असतं. जर चांगले नजरेतून बघितला तर नक्कीच तो विचार पूर्णत्वाला जातो अन तशीच ऊर्जा स्फूर्ती ही मिळते, पण जर तोच विचार वाईट दृष्टिकोनातून बघितला तर नक्कीच ते काम पण होत तर नाहीच वर त्रास होतो तो वेगळाच.  आणि याचा परिणाम होतो तो म्हणजे 'मानसिकतेवर'. एकवेळ माणूस शारीरिक दृष्ट्या कमजोर असला तर नक्कीच बरा होईल पण जर माणूस मानसिक दृष्ट्याच खचला तर त्याला कोणतंच औषध बरं करू शकतच नाही.
    काही विचार तर चांगलेही असतात पण आपलं मन नेहमीच अधिक चांगला, अधिक सुखाच्या शोधत फिरत असतं. त्या अधिक चांगल्याच्या नादात आपण आपल्या कडे असलेले खूप काहीतरी नक्कीच गमावून बसतो . पण जेव्हा हे लक्षात येते तेव्हा वेळ गेलेली असते.
   
माणसाला एकाच वेळी खुपसाऱ्या गोष्टी हव्या असतात.अन जर इच्छाशक्ती प्रबळ असेल तर त्या मिळतात सुद्धा .
 
गरज असते ती फक्त आलेला विचार सकारत्मकतेने बघण्याची, समजून घेण्याची, कष्टाची तयारी ही तितकीच लागतेच. त्यामुळे फळाची अपेक्षा करता 'प्रयत्न' करणं हे तर  नक्कीच आपल्या हातात असत. बाकी यश अपयश हा तर प्रत्येकाच्या नशिबाच्या भाग. नशिबात असेल तर ते कसेही मिळेल पण जर नशीबातच नसेल तर प्रयत्न करून सुद्धा कधी कधी अपयशच येते. पण याचा अर्थ असा नाही की प्रयत्न अपयशी ठरले, कमी पडली ती प्रबळ इच्छा शक्ती. त्या अपयशातून सुद्धा शिकण्यासारखे भरपूर असते जे पटकन मिळालेल्या यशात देखील सापडत नाही.
 
यावर वाचनात आलेला एक लेख तर फारच आवडला ;
 "चन्द्रगुप्त नी विचारले
जर नशिब आधीच लिहिले आहे तर प्रयत्न करून काय फायदा..?
चाणक्य म्हणाले काय माहित नशिबात लिहिले असेल कि प्रयत्न केले तरच मिळणार."
  हे सगळं फक्त मनात येणाऱ्या विचारांवर अन पाहण्याचा दृष्टिकोनावर अवलंबून असते. जर आपण येणाऱ्या विचारांची जर नेहमी तुलना करत राहिलो तर मात्र सगळंच अवघड होऊन बसतं. अन गोंधळ , त्रास होतो तो तर वेगळाच. कधी कधी गेलेली संधी पुन्हा नक्की मिळेल अन एकदा गेलेली वेळ कधीच पुन्हा येत नाही.फक्त आलेल्या संधीची आणि मनात सूरु असणाऱ्या गोंधळाची सरमिसळ होता कामा नये. वेळ ही नेहमीच नवीन संधी घेऊन येत असते. फक्त त्याचा योग्य वेळी योग्य इच्छाशक्ती ठेवून त्या संधीचा फायदा ज्याला घेता येतो तो नक्कीच पुढे जातो यशस्वी ठरतोच. गरज असते ती सकारत्मकता,इच्छाशक्ती, कष्ट आणि मानसिकतेची. ह्या गोष्टी जर मनात कायम असतील तर नेहमीच आनंदी, उत्साही राहायला मदत होईल. यामुळे नक्कीच चांगल्याच गोष्टी घडतील. 
  आणि हो प्रयत्न ते तर शेवट पर्यंत मनापासून केलेच पाहिजेत, यश तर मिळेलच आणि जरी अपयश आलचं तरी खचता पुढे गेले पाहिजे कारण आलेलं अपयश हे नक्कीच काहीतरी शिकविणारे असेल आणि पहिल्यापेक्षा अजून चांगली संधी नक्कीच घेऊन आलेलं असेल.
  '
बाकी सगळं नशिबावर आहेच....'
 
असो हे झालं माझं मत अन अनुभव. पण हे कितपत योग्य आहे , उपयोगी आहे ह्याचा नक्कीच मनापासून विचार करण्या सारखं आहे
....
 

विचार

विचार शब्द जरी ऐकू आला तरी डोक्यात , मनात विचारांचा बाजार कसा भरून जातो कळत देखील नाही. सकळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत असा एक क्षण देखील...